धन संपत्तीची देवता म्हणून सगळे कुबेराला ओळखतात. परंतु त्यांच्या पूर्वजन्माची कथा मात्र फारच थोड्या लोकांना माहित आहे. शिव पुराणातील या प्रसंगात ऐकूया, की मंदिरात चोरी करणाऱ्या चोराने अजाणतेपणाने केलेल्या कृत्यामुळे त्याला कशाप्रकारे कुबेर पद प्राप्त झालं. आणि कशाप्रकारे त्याला शंकराला प्रिय झाला.
काम्पिल्य गावात यज्ञदत्त नावाचा एक ब्राम्हण राहत होता. त्यांना एक गुणनिधी नावाचा मुलगा होता. गुणनिधी अगदी आपल्या नावाच्या विरूध्द वागत असे. तो दुर्गुणी आणि उध्दट होता. त्याच्या या वागण्याला कंटाळून यज्ञदत्तने गुणनिधीचा त्याग केला. त्याला घरातून हाकलले. घरातून बाहेर पडल्यानंतर बरेच दिवस तो उपाशीपोटी भटकत राहिला. एके दिवशी मंदिरातील दान चोरण्याच्या हेतूने तो शंकराच्या मंदिरात गेला. तिथे त्याने आपली वस्त्र जाळून प्रकाश केला. हे कृत्य म्हणजे एकप्रकारे भगवान शंकराला दिप दान केल्यासारखेच झाले. चोरीच्या अपराधात त्याला पकडून मृत्यूदंडाची शिक्षा सुनीवण्यात आली. त्याच्या चुकीच्या कृत्यांमुळे यमदूतांनी त्याला बांधून घातले. मात्र शिवगणांनी तिथे येऊन त्याची सुटका केली. भगवान शंकराच्या गणांसोबत राहिल्यामुळे त्याचे मन शुध्द झाले. त्यानंतर गुणनिधी त्या शिवगणांसोबत शिवलोकात गेला. तिथे साऱ्या दिव्य शक्तींचा उपभोग घेतल्यामुळे तसेच शंकर पार्वतीची सेवा केल्यामुळे पुढचा जन्म त्याला कलिंगराज अरिंदम याचा पुत्र म्हणून मिळाला. कलिंगराज याने आपल्या पुत्राचे नाव दम असे ठेवले. दम सतत शिवाच्या आराधनेत असे. लहान असूनसुध्दा तो इतर लहान मुलांसोबत शिव शंकराची भजने गात असे. तारूण्यावस्थेत असताना त्याच्या पित्याचे निधन झाले. त्यानंतर कलिंगच्या सिंहासनावर दम बसला.
राजा दम अत्यंत उत्साहाने आणि प्रसन्नतेने सर्वत्र शंकराच्या उपासनेचा प्रसार करू लागला. त्याने आपल्या राज्यातील सर्व गावांमध्ये शिव मंदिरात दिप दानाच्या प्रथेचा प्रचार सुरू केला. त्याने सर्व गावातील प्रधानांना सूचना दिल्या की, त्यांच्या गावाच्या आसपास जेवढीही शंकराची मंदिरे असतील त्या सर्व मंदिरांमध्ये अखंड दिप तेवत राहिला पाहिजे. आयुष्यभर या धर्माचे पालन केल्यामुळे दम राजाकडे मोठी धार्मिक संपत्ती निर्माण झाली. त्यामुळे मृत्यूनंतर तो अलकापुरीचा राजा झाला.
ब्रम्हदेवांचा मानसपुत्र पुलस्त्य याचा पुत्र विश्रवा. आणि विश्रवाचा पुत्र वैश्रवण म्हणजे म्हणजेच कुबेर. त्याने पूर्वजन्मी भगवान शंकराची आराधना करून विश्वकर्माने निर्माण केलेल्या या अलकापुरीचा उपभोग घेतला. त्या युगाची समाप्ती होऊन मेघवाहन युगाची सुरूवात झाली. त्यावेळी यज्ञदत्ताचा पुत्र ज्याने प्रकाश दान केला होता तोच कुबेराच्या रूपामध्ये अत्यंत कठीण अशी तपश्चर्या करू लागला. दिप दानामुळे शंकराकडून मिळणाऱ्या आशिर्वादाच्या ताकदीबद्दल त्याला माहिती होती. त्यामुळे तो शिवाच्या काशी नगरीत गेला. तिथे तो अनन्य भक्तीने, प्रेमाने आणि तन्मयतेने अगदी निश्चल होऊन अकरा रूद्रांचे ध्यान करू लागला. अनेक वर्षे अशी तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकर पार्वती देवीसह प्रकट झाले. भगवान शंकरानी अत्यंत प्रसन्नतेने अलकापती कुबेराला पाहिले. आणि म्हणाले, अलकापती, तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे. तुला वर देण्यासाठी मी तयार आहे. तुझी मनोकामना मला सांग.
ही वाणी ऐकून कुबेराने डोळे उघडून पाहिले. तर प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्या समोर उभे असलेले त्याला दिसले. प्रातःकालच्या सूर्यासारख्या हजारो सूर्यांच्या तेजाने भगवान शंकर तेजस्वी झाले होते तर माथ्यावरची चंद्रकोर चमकत होती. शंकरांच्या या तेजामुळे कुबेराचे डोळेच मिटले. कुबेराने आपले डोळे मिटून घेतले आणि आपल्या मनातील भगवान शंकरांशी तो बोलू लागला. नाथ, माझ्या डोळ्यांना आपण अशी दिव्य दृष्टी द्या की मी आपले तेजस्वी रूप पाहू शकेन. आपले प्रत्यक्ष दर्शन हात माझ्यासाठी खूप मोठा वर आहे. मला दुसरा कोणताच वर नको.
कुबेराचे हे बोलणे ऐकून भगवान शंकरांनी आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवला आणि आपले दिव्य रूप पाहण्याची शक्ती त्याला प्रदान केली. दृष्टिची शक्ती मिळाल्यानंतर यज्ञदत्ताच्या पुत्राने डोळे उघडले आणि त्याची नजर पार्वती देवीवर पडली. देवीला पाहून त्याच्या मनात विचार आला की, भगवान शंकरांसोबत ही सर्वसुंदरी कोण आहे? यांनी असा कोणता तप केला जो माझ्या तपश्चर्येपेक्षाही खडतर आहे. हे रूप, हे प्रेम, हे सौभाग्य आणि असीम सौंदर्य सारेच किती अद्भुत आहे.
तो ब्राम्हणकुमार पुन्हा पुन्हा हेच बोलून देवीकडे निरखून पाहू लागला. त्याच्या या विचित्र वागणुकीमुळे त्याचा डावा डोळा फुटला. यावर देवी पार्वती, भगवान शंकराला म्हणाली, हा दुष्ट तपस्वी सारखा सारखा माझ्याकडे पाहून काय अर्वाच्य बोलत आहे? देवीच्या या प्रश्नावर हसत हसत भगवान शंकर म्हणाले, हा तुझाच पुत्र आहे आणि हा तुझ्याकडे नजरेने पाहत नाहीय तर तुझ्या अमाप तप संपत्तीचे गुणगान गात आहे. देवीला असे समजावून भगवान शंकर कुबेराला म्हणाले, वत्सा मी तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला वर देतो की, तु धनाचा राजा तसेच यक्ष, किन्नर आणि राजांचादेखील राजा होशील. पुण्यवान लोकांचा पालक आणि सर्वांसाठी धनाचा दाता होशील. माझ्या सख्या, तुझ्याशी कायम माझे मैत्र राहिल. आणि नेहमीच मी तुझ्या सोबत वास करेन. तुझ्याशी स्नेह वाढवण्यासाठी मी अलकापुरीजवळच वास्तव्य करेन. ये, पार्वती देवीला चरणस्पर्श कर. ही तुझी माता आहे. महाभक्त यज्ञदत्त पुत्र, अत्यंत प्रसन्नचित्ताने तु या पावलांचा आशीर्वाद घे.
अश्याप्रकारचा आशीर्वाद दिल्यानंतर भगवान शंकर, पार्वती देवीला म्हणाले, देवेश्वरी, याच्यावर कृपा कर. तपस्विनी, हा कुबेर,तुझाच पुत्र आहे. भगवान शंकरांनी असे वृत्त कथन केल्यानंतर जगदंबा पार्वती प्रसन्न होऊन यज्ञदत्त पुत्राला म्हणाली, वत्सा, भगवान शंकराचरणी ही तुझी निर्मल भक्ती कायम राहू दे. महादेवांनी तुला जे वर दिले आहेत अत्यंत सुलभतेने तुला त्याच रूपात लाभूदेत. माझ्या रूपाची तुला जी ईर्षा झाली त्यामुळे तु कुबेर या नावाने प्रसिध्द होशील. अश्याप्रकारे कुबेराला वरदान देऊन भगवान शंकर पार्वतीसह स्वगृही निघून गेले. आणि अश्याप्रकारे भगवान शंकरांशी मैत्र प्राप्त करून कैलास पर्वताजवळ अलकापुरीला त्यांचे निवासस्थान झाले.
Podchaser is the ultimate destination for podcast data, search, and discovery. Learn More